Wednesday, May 13

Samriddhi highway ; समृध्दी महामार्गावरील पुलाचे काम वाहनधारकांच्या मुळावर

नांदेड। नांदेड ते जालना मार्गे जाणार्‍या समृद्धी महामार्गावरील नाळेश्वर आणि रहाटीच्या मध्यभागी सुरु असलेल्या पुलाचे काम गेल्या सहा महिन्यापासून अत्यंत मंदगतीने सुरु आहे.

येथुन ये-जा करणार्‍या वाहन धारकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पुलाच्या बाजुने तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला असून हा रस्ता भरपावसाळ्यात वाहनधारकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. याच रस्त्यामुळे तीन जणांना आतापर्यंत आपला हाकनाक जीव गमवावा लागला आहे. आणखी यात किती जणांचा बळी घेणार हे संबंधीत कंत्राटदारालाच माहित. अशा या निष्क्रीय कंत्राटदारा विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाकडून कोटयवधी रुपये खर्च करुन मोठ-मोठे रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरविण्याचे काम सुरु आहे. बहुतांश भागातील रस्तेही पूर्णत्वाला गेली आहेत. दळण-वळणासाठी जलदगतीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या समृद्धी महामार्गाचे अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. नांदेड ते जालना मार्गे जाणार्‍या समृध्दी महामार्गाचे काम नाळेश्वर आणि रहाटीच्या मध्यभागी पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत कासवगतीने सुरु आहे. याकडे संबंधीत ठेकेदाराने सोईस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

पुलाच्या कडेने वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून रस्ता बनवण्यात आला आहे. हा रस्ता भर पावसाळ्यात कुचकामी ठरत आहे. येेथे अनेक वाहनांचे अपघात नित्यनियमाने घडत आहेत. सुदैवाने मोठी जीवीतहानी होत नसली तरी गेल्या सहा महिन्यात तीन  जणांना या ठिकाणावर आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधीत कंत्राटदाराकडून तात्काळ पर्याची मार्गाचे काम दर्जेदार न झाल्यास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाळेश्वर-रहाटी परिसरातील नागरिकांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!