Saturday, May 16

Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

मुंबई| ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्याहीपलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कर्करोग रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय असो हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मी.मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य शासना सोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे रतन टाटा हे मुकुटमणी होते. आधुनिक व्यवस्थापकीय तत्वांचा अंगिकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित केले.

१४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन टाटा समूहाने आपल्या उत्पादन व सेवेच्या माध्यमातून स्पर्शले, याचे श्रेय जसे टाटा समूहाचे आहे, तसेच ते रतन टाटा यांच्या व्यापक दृष्टीचे देखील आहे. अनेक क्षेत्रात नीतीमूल्यांशी तडजोड होत असताना देखील रतन टाटा यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत भारतीय नीतीमूल्यांची कसोशीने जपणूक केली.

रतन टाटा हे खऱ्या अर्थाने भारतीय उद्योग क्षेत्राचे ‘विवेक रक्षक’ होते. बृहत विश्व समाजाच्या शाश्वत कल्याणाचा विचार करणारे ते ऋषितूल्य व्यक्तिमत्व होते. विकसित भारताचे उद्दिष्ट प्राप्त करताना त्यांनी प्रस्थापित केलेल्या विश्वास, उत्कृष्टता व नाविन्यता या मूल्यांचा प्रत्येक क्षेत्रात अंगिकार करणे, हीच टाटा यांना श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!