नांदेड| शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील मौजे नागनी येथील मांजरानदी पात्राचे पाणी गावात शिरून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनी गावातील महिला व नागरिक यांना कुंडलवाडी येथे के रामलू मंगल कार्यालय येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथे प्रशासनाच्यावतीने त्याच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.


नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच गावात पुराचे पाणी आले. अनेक नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. नांदेड येथील सीआरपीएफ च्या मदतीने नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील 80 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे.


मदतकार्य – नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन नेहमी दक्ष असून सतत तत्परतेने कार्यवाही करत आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे तसेच कोट्या येथील तलाव फुटल्याने मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये पाणी येऊन अंदाजे 150 घरात पाणी गेले. या घरातील 250 नागरिकांना नगरपरिषद, महसूल तहसील, पोलीस प्रशासन व शहरातील नागरीकांच्या मदतीने तात्काळ मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेत व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.



मागील दोन दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन अनेक तालुक्यातील गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून नागरिकांना सोडविण्यासाठी एसडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या टीमच्या माध्यमातून अथक प्रयत्न करून नागरिकांना सुरक्षित सोडविण्यात येत आहे. 27 व 28 ऑगस्ट रोजी लेंडीनदी, तिरुनदीला आलेल्या पुराचे पाण्यामुळे लेंडी धरणातील बॅकवाटरचे पाणी मुखेड तालुक्यात भिगोली या गावात शिरून घरात 20 नागरिक अडकले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव तहसीलदार यांनी व त्यांच्या टिमने नागरिकांना सुखरूप बाहेर काढुन सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात आले.


मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे मन्याड नदीला आलेल्या पुराच्या वेढ्यात बेटमोगरा शिवारात दोन दिवसापासुन अडकलेले मौला शेख यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेड तहसीलदार राजेश जाधव यांनी एसडीआरएफ पथकाच्या मदतीने रात्री सुरक्षित बाहेर काढले. याबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून, नांदेड जिल्ह्यात जिथे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत तिथे एसडीआरएफ, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित सुखरूप ठिकाणी हलविण्यात येत आहे.

मन्याड नदीच्या पुरात वझरगा येथील मारोती हनमंत कोकणे हा व्यक्ती मौ. टाकळी खुर्द येथे वाहून जातांना त्याने झाडावर आश्रय घेतला होता. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेनुसार बिलोलीचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, सहाय्यक महसूल अधिकारी राजेश्वर आलमवाड, महसूल सहाय्यक शेख युनूस व बोटऑपरेटर आशिष जनार्दन आंबोडे यांच्या पथकाने त्या व्यक्तीला बोटीच्या सहाय्याने टाकळी खुर्द येथून सूखरुप बाहेर काढले.

मारोती कोकणे या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी महसूल, पोलीस प्रशासन, टाकळी गावचे सरपंच, गावकऱ्यांनी, मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, ग्राम महसूल अधिकारी प्रणिता काळे, शिवाजी घोंगडे, चव्हाण, ललित पाटील, मिलिंद सुपेकर, बीट जमादार काळे आदींनी सहकार्य केले.

