देगलूर, गंगाधर मठवाले | शहापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कनकटे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (हातावर घड्याळ बांधत) प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा ठिणगीसारखा परिणाम भाजपाच्या कार्यकत्यांवर होऊ नये, यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी शहापूर व परिसरातील कार्यकत्यांवर कडी नजर ठेवली असल्याचे चित्र दिसत आहे.


यावेळी भाजपाचे कार्यकर्ते गगारेडी कोटगिरे यांचा नांदेड येथे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात खासदारांनी शहापूर परिसरातील गावांना विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.

🔹 शिवाजी कनकटे यांचा राजकीय प्रवास
कनकटे यांनी अगोदर काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. परंतु, आता त्यांनी हातावर घड्याळ बांधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे कट्टर विरोधक असलेले गगारेडी कोटगिरे यांच्यासोबत ते एकाच पक्षात आल्याने राजकीय वाद निवळतील व विकासाची गाडी वेग घेईल अशी अपेक्षा होती. मात्र आता पुन्हा समीकरण बदलल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.



🔹 स्थानिक राजकारणातील गुंतागुंत
शहापूर सरपंच पद हे ओबीसीसाठी सुटले असून मुस्लिम मतदार कोणाकडे झुकतात, त्यावर विजय निश्चित होतो. भविष्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतही याचा फटका भाजपाला बसू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. इरवत तोनसूरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

🔹 एकनिष्ठ कार्यकर्ता ठाम
सर्वजण पक्ष बदलत असताना, शहापूरचे मलनरेडी चितलवार हे मात्र पुर्वीपासून भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यामुळे शिवाजी कनकटे यांची राजकीय दाल कितपत शिजेल, हा प्रश्न जनतेत उपस्थित होतो. कार्यक्रमाला विठ्ठलरेडी बकायगार, सुभाष माटलवार, संजय पांचाळ, सायलु गायकवाड आदी उपस्थित होते. सध्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असताना, खासदार गोपछडे मात्र ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

