हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, रस्ता आहे की खड्ड्यांची मालिका, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दोन-तीन वेळा रस्त्याचे काम करूनही काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार आणि ठेकेदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मार्गावरून दररोज नागरिक, वाहनधारक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि चिखलामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात
दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गरोदर माता, वृद्ध व्यक्ती आणि शाळकरी मुलांना या जीवघेण्या रस्त्यावरून ये-जा करावी लागत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार निधी खर्च होतो; मात्र रस्ता काही दिवसांतच पुन्हा खड्ड्यात जातो. त्यामुळे कामाच्या दर्जाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आमदार-खासदारांसह बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष?
रस्त्याची दुरवस्था अनेक दिवसांपासून कायम असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप वारंग टाकळी, मंगरूळ, खैरगाव परिसरातील नागरिकांनी केला आहे.

“या खड्डेमय रस्त्यावर एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

