नांदेड| होळी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी द्विअर्थी कव्वालीचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे सिने गीतकार व गायक एकनाथ माळी (पार्टी पनवेल) विरुद्ध महाराष्ट्राची ‘डेंजर फटाकडी’ गायिका ज्योती शिंदे (पार्टी नवी मुंबई) यांच्यात रंगणाऱ्या या सामन्यामुळे रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोमवार दि. २ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता मार्केट कमिटी मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, सुरेश लोट, डॉ. जुगल धूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

उद्घाटन व मान्यवर उपस्थिती
महामूर्ख कवी संमेलनाचे उद्घाटन मार्केट कमिटीचे सभापती संजय लहानकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी नेते बाबुराव पुंजरवाड हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित उपमहापौर दीपकसिंह रावत उपस्थित राहणार आहेत.



प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रसाद राठी, सतीश शर्मा, योगेश जायस्वाल, नवल पोकर्णा, सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सेवकसिंघ जहागीरदार, नागेश शेट्टी, शिवाजी ईबितवार, अंबादास लालपोतू, छोटा बंडू पावडे, चिंटू हरकारे, हरिभाऊ पावडे, बंटी अग्रवाल, व्यंकट मोकले, आनंद साताळे, प्रमोद हिबारे, सुभाष देवकत्ते, एकनाथ टेकाळे, जुगलकिशोर शुक्ला, सुमेर राजपुरोहित यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत.

स्त्री सहभागाचा ऐतिहासिक क्षण
संयोजक दिलीप ठाकूर हे नेहमी वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. मागील पंचवीस वर्षांत महामूर्ख कवी संमेलनात ना प्रेक्षक म्हणून ना कवी म्हणून कोणतीही स्त्री सहभागी झाली नव्हती. मात्र यंदा द्विअर्थी कव्वाली गायनाच्या माध्यमातून ज्योती शिंदे यांनी सहभागाची हिंमत दाखवत इतिहास घडवला आहे. त्यामुळे यावर्षीच्या संमेलनात वेगळीच रंगत आणि रंजकता निर्माण होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे सिद्धार्थ खिल्लारे, शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवार, राजेंद्र शर्मा, बजरंग पारीख, लच्छू देशमुख, विलास जोगदंड हे कवी आपल्या शृंगारिक कविता व विनोदी सादरीकरणातून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.
बनारस आणि नांदेड – अनोखी परंपरा
होळीच्या निमित्ताने मनातील कोंडलेले विचार मोकळेपणाने मांडण्याची परंपरा भारतात पुरातन काळापासून आहे. विशेष म्हणजे महामूर्ख कवी संमेलनाची परंपरा देशात फक्त वाराणसी (बनारस) आणि नांदेड येथेच जपली जाते, ही बाब नांदेडकरांसाठी अभिमानाची मानली जाते.
भव्य तयारी, वेळेचे काटेकोर पालन
महामूर्ख कवी संमेलनासाठी मार्केट कमिटीच्या मैदानावर भव्य व्यासपीठ व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनिक्षेपक वापरण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित असल्याने कार्यक्रम नेमक्या सायं. ६ वाजता सुरू होणार आहे. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी कामाजी सरोदे, राजेशसिंह ठाकुर, सुरेश शर्मा, अरुण काबरा, संतोष भारती, शिवा लोट, सुरेश निल्लावार हे परिश्रम घेत आहेत.
संयोजन समितीतर्फे नांदेडकरांना आवाहन करण्यात आले आहे की, होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोळा वर्षावरील तरुण व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा.

