नांदेड, प्रतिनिधी| भोकर तालुक्यातील महत्त्वपूर्ण पिंपळढव साठवण तलाव प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून ८५.४१ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश आले आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला.



पिंपळढव प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १३१.११ कोटी रुपये असून, यापूर्वी सुमारे ५५.७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित निधीसाठी आ. श्रीजया चव्हाण सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.



राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या निर्णयांतर्गत पिंपळढव साठवण तलाव प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला असून, त्यासाठी ८५.४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



या प्रकल्पामुळे पिंपळढव, डौर, जामदरी, सिद्धार्थ नगर, वाडी, मातूळ, लगळूद आणि रावणगाव परिसरातील सुमारे ६६० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, पिंपळढव प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
नाबार्डच्या अर्थसहाय्यामुळे पिंपळढव साठवण तलाव प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, या निर्णयाकडे परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या दृष्टीने आश्वासक घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

