Wednesday, May 13

water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

सोनारी फाटा/हिमायत्तनगर,शेख खय्युम। तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायत मधील नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी या हेतूने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून व मागासवर्गीय अनुदान निधीतून असे दोन्ही पाणी फिल्टर मशीन मागील जळवपास तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या होत्या त्या मशीनीची सद्याची स्थिती पाहता, धुळखात पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे.

ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर बंद असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पदरात मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत. या पाणी फिल्टरवर लाखो रूपये खर्च केले गेले, मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.

तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेली मोठी ग्रामपंचायत असल्याने जवळपास तीन वर्षापूर्वीच वॉटर फिल्टर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील दोन्ही मशीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर लावण्यात आल्या. ग्रामपंचायतकडून पाच रुपयांत १५ लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, ही सुविधा आता निकामी ठरली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेल्या मशीनला पाणी उपलब्ध आहे , पण ग्रामपंचायतला निधी उपलब्ध नसल्याने अनेक कारणास्तव ह्या मशीन बंद अवस्थेत केवळ ग्रामपंचायत कार्यालयाची शोभा वाढवत आहेत. गावात लावण्यात आलेल्या मशीनचे काम योग्यरित्या करण्यात आले नाही. बसविताना सदोष काम करण्यात आले.

यामुळे काही दिवसांतच ही मशीन जमीनदोस्त झाली. तेव्हापासून या मशीनकडे दुर्लक्ष करण्यात आले. ह्या मशीन उपयोगात नसल्यामुळे या गावातील नागरिकांना आता खाजगी ठिकाणी २० लिटर पाणी २० रुपयांत पाच किमी अंतरावरून विकत घेऊन आणावे लागत आहे. गावातील जलस्रोताचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळेच वॉटर फिल्टरची सोय करून देण्यात आली होती.

परंतु ग्रामपंचायतीला ही टिकवता आली नाही. मशीन दुरुस्ती किंवा इतर उपाययोजना करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. नागरिकांच्या आरोग्याचा, आर्थिक प्रश्न असताना ग्रामपंचायतीला काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसते. दुरुस्ती केल्यास या मशीन उपयोगात आणता येऊ शकतात. वास्तविक फिल्टर मशीनचे काम सुरू असताना ग्रामसचिवांनी लक्ष घालणे अपेक्षित होते, परंतु, त्यांनी याची तसदी घेतली नाही. आताही याविषयी गांभीर्य दाखविले जात नाही, या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!