हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भक्तिमय झालेल्या वातावरणात आता गौरी-लक्ष्मी मातेच्या आगमनाने घराघरांत मंगलमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या गौरी-लक्ष्मी उत्सवाची तयारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने केली असून, विधिवत पूजाअर्चा करून मातेचे स्वागत करण्यात येत आहे.


गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप, सौभाग्य, ऐश्वर्य, धन-धान्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गणरायाच्या आगमनानंतर गौरी मातेचे घरात आगमन होणे ही अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली धार्मिक परंपरा आहे. माता गौरीच्या कृपेने घरात सुख-शांती नांदावी, धन-धान्याची भरभराट व्हावी आणि कुटुंबाचे आरोग्य व कल्याण लाभावे, अशी भक्तांची श्रद्धा आहे.


परंपरेनुसार विविध कुटुंबांमध्ये गौरी स्थापनेच्या पद्धतीतही वेगळेपणा पाहायला मिळतो. काही घरांत पाटावर गौरीची स्थापना केली जाते, काही ठिकाणी मडक्याच्या स्वरूपात गौरीची पूजा केली जाते, तर काही घरांत पारंपरिक पद्धतीने गौरी अर्थात लक्ष्मी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येक घरातील प्रथा वेगळी असली तरी त्यामागील भक्तिभाव आणि श्रद्धा मात्र सारखीच आहे.



गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर घरांची स्वच्छता करून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, तोरणे आणि दीपप्रज्वलनाने सजावट करण्यात येते. विशेषतः घरातील महिला आणि लेकी मातेच्या आगमनाची तयारी भक्तिभावाने करीत असून, पारंपरिक पद्धतीने सजावट करून गौरीचे स्वागत करीत आहेत.

गौरी मातेच्या स्थापनेनंतर पंचोपचार अथवा षोडशोपचार पद्धतीने पूजा, आरती, नैवेद्य आणि धार्मिक विधी केले जातात. काही कुटुंबांमध्ये या निमित्ताने विविध प्रकारचे पारंपरिक नैवेद्य तयार केले जातात. गौरीच्या दोन दिवसांच्या उत्सवात आप्तस्वकीय, नातेवाईक आणि शेजारी-पाजाऱ्यांना निमंत्रित करून भोजन देण्याचीही परंपरा आहे.

गौरी-लक्ष्मी उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून श्रद्धा, संस्कार, कुटुंबीय एकोपा आणि सामाजिक स्नेह जपणारा उत्सव म्हणूनही महत्त्वाचा मानला जातो. जुन्या परंपरा आणि रितीरिवाज नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या उत्सवाच्या माध्यमातून होत आहे.

गौरी मातेच्या आगमनाने घरात लक्ष्मीचा वास, अन्न-धान्याची समृद्धी आणि मंगलमय ऊर्जेचे आगमन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ‘गौरी आली, लक्ष्मी आली, समृद्धी आली’ या भक्तिभावाने घराघरांत मातेची आराधना केली जात आहे.

माता गौरी-लक्ष्मीच्या चरणी कुटुंबाचे सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात धन-धान्याची भरभराट व्हावी, यासाठी भाविकांकडून मनोभावे प्रार्थना केली जात आहे.
॥ श्री महालक्ष्मी मातेला नमः ॥
॥ गौरी माता की जय ॥
॥ गणपती बाप्पा मोरया ॥

