नांदेड, अनिल मादसवार | आगामी गणेशोत्सव व श्री गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा, यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे. महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरातील पाच प्रमुख विसर्जन स्थळांची संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.


यावेळी उपमहापौर दिपकसिंह रावत, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित विसर्जनासाठी महापालिकेच्या यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.


आसना नदी परिसरातील पासदगाव व सांगवी येथील विसर्जन स्थळांची पाहणी करून कृत्रिम तलावांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती व आवश्यक सोयी-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



पुयनी आणि झरी खदान परिसरातील विसर्जन स्थळांवर मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी रॅम्प, क्रेन आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. गोदावरी नदीवरील मुख्य नावघाटाचीही पाहणी करण्यात आली. घाटांची स्वच्छता, डागडुजी तसेच विसर्जन मार्गांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जीवरक्षक, रुग्णवाहिका अन् अग्निशमन दल सज्ज – विसर्जनाच्या दिवशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी अग्निशमन दल व वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रमुख घाटांवर जीवरक्षक व रुग्णवाहिका तैनात राहणार आहेत. यासोबतच पिण्याचे पाणी, तात्पुरते मंडप, बॅरिकेडिंग आणि विद्युत व्यवस्था यांसह आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
गणेश विसर्जन हा आनंदाचा आणि भक्तीचा सोहळा असून नागरिकांनी घाट व खदान परिसरात विनाकारण गर्दी करू नये. प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करून मनपा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी केले.
नदीपात्रातील कमी पाणी; कृत्रिम तलावांचा वापर करा – यंदा कमी पर्जन्यमानामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. ही परिस्थिती लक्षात घेता गणेश मंडळे आणि घरगुती गणपती विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेला सहकार्य करून शक्यतो कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त गंगाधर इरलोड, उपायुक्त स. अजितपालसिंग संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादिक, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संघरत्न सोनसळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिट्ठे, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, रावण सोनसळे, राजेश जाधव, नागनाथ पतंगे, गौतम कवडे, विठ्ठल तिडके, उपअभियंता खुशाल कदम, सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे आदी उपस्थित होते.

