हिमायतनगर /भोकर, अनिल मादसवार | भोकर-नांदेड मार्गावर गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वागद शिवारात ट्रक आणि मॅक्सिमो मिनी व्हॅनची समोरासमोर भीषण धडक झाली. या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या अपघातात मॅक्सिमोमधील ८ जणांचा मृत्यू, तर ७ जण जखमी झाले अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेने भोकर तालुक्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक AP-29 TA-8129 हा भोकरहून नांदेडकडे जात असताना समोरून येणाऱ्या MAAXIMO MINI VAN क्रमांक MH-26 AK-0548 ला वागद शिवारात जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की मॅक्सिमो वाहनातील आठ जणांचा मृत्यू झाला.


मृतांमध्ये हिमायतनगर तालुक्यातील पोटा तांड्यासह भोकर शहरातील नागरिक – मृतांमध्ये बळीराम विनायक पवार (पोटा तांडा), पांडुरंग लिंगोजी वाघमारे (भोकर ), लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे (भोकर ), शेख फिरोज शेख रमजान (भोकर) , सय्यद अल्तमास सय्यद आलीमोद्दीन (भोकर ) , शाहिद सौदागर (भोकर ), कृष्णा विनायक पवार (पोटा तांडा ) यांचा समावेश आहे. याशिवाय एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.



सात जखमींवर भोकर व विष्णुपुरीत उपचार – अपघातात रेखा बदगे, सोमनाथ मारुती येळणे, शेख खलील शेख वाहिद, शेख जलील शेख अहमद, पिंटू गोविंदराव डावरे, रेहान शेख आणि ट्रक चालक बासुमिया राजूमिया हे जखमी झाले आहेत. यापैकी दोन जखमींवर भोकर ग्रामीण रुग्णालयात, तर उर्वरित पाच जखमींवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील मृतांचे इनक्वेस्ट पंचनामे करून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सीताखांडी अपघातानंतर खासदार अशोकराव चव्हाण यांची रुग्णालयात धाव – दरम्यान, भोकर तालुक्यातील सीताखांडी येथे झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमींची माहिती घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी, भोकरचे पोलीस निरीक्षक तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. खासदार अशोकराव चव्हाण यांनी जखमींना तातडीने आणि आवश्यक ते सर्व औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
अपघातांची मालिका; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर – भोकर-नांदेड मार्गावर वारंवार घडणाऱ्या भीषण अपघातांमुळे रस्ते सुरक्षा, वाहनांची तपासणी आणि वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्पाप नागरिकांचे जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांचा गांभीर्याने आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

