मुंबई/नांदेड/हदगांव/हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील परिवहन विभागाशी संबंधित विविध विकासकामांना गती मिळावी, यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मतदारसंघातील नागरिकांच्या दळण वळणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विविध मागण्यांचे निवेदन परिवहन मंत्र्यांना सादर करण्यात आले.


यामध्ये हदगाव येथील बस डेपो व बसस्थानकाच्या बांधकामाचा प्रश्न, तसेच तामसा येथील बसस्थानकाचे बांधकाम व विकासकामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर हिमायतनगर शहर व परिसरातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन हिमायतनगर येथे नवीन बसस्थानक उभारण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणीही आमदार कदम कोहळीकर यांनी केली.


नवीन बससेवा आणि बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन नवीन बससेवा सुरू करावी तसेच विद्यमान बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.




ग्रामीण भागातील नागरिकांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असल्याने परिवहन विभागाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार कदम कोहळीकर यांनी मांडली.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख, नांदेड विवेक देशमुख तसेच पंचायत समिती हदगावचे उपसभापती बाबूसराव कदम उपस्थित होते.
मतदारसंघातील बसस्थानकांच्या विकासासह नवीन बससेवा आणि बसफेऱ्यांमध्ये वाढ झाल्यास नागरिकांच्या प्रवासाची मोठी सोय होणार असून, आता परिवहन विभागाकडून या मागण्यांवर कोणती कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

