हिमायतनगर, अनिल मादसवार| भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष आदित्य पाटील शिरफुले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावरील जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यावरील तडे, रस्त्यालगतची अतिक्रमणे, अनधिकृत प्रवेशमार्ग आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना यामुळे सातत्याने गंभीर अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.


टोल वसुली करूनही संबंधित टोल कंपनी प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार प्रवास देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्याची वेळेवर दुरुस्ती, अपघातग्रस्तांसाठी तातडीची रुग्णवाहिका, क्रेन सेवा, दिशादर्शक फलक, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सुविधा प्रभावीपणे उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



महामार्गावरील सर्व त्रुटी दूर करून सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी तसेच संबंधित टोल कंपनीच्या कामकाजाची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य पाटील शिरफुले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

