सरसम/सोनारी फाटा, हिमायतनगर,प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील सरसम ते वाळकेवाडी या आदिवासी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सहा ते सात हजार लोकसंख्येच्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या वाळकेवाडीला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा हा प्रमुख मार्ग असून, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थ याच रस्त्याचा वापर करतात. मात्र सध्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी, ऑटो तसेच रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण झाले आहे. अनेकदा वाहने खड्ड्यात अडकून पडत असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुमारे चार किलोमीटरच्या या रस्त्यावर गेल्या चार वर्षांत चार वेळा काम करण्यात आले, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काहीच महिन्यांत रस्ता पुन्हा खड्डेमय झाला. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले असून, काही ठिकाणी १० इंच ते ४ फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सततच्या धक्क्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहनधारकांचा खर्चही वाढत आहे.




ग्रामस्थांनी सांगितले की, या रस्त्याबाबत स्थानिक आमदार आणि खासदारांकडे अनेकदा तोंडी पाठपुरावा करण्यात आला असून आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“खड्डे टाळायचे की जीव वाचवायचा?”
खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांची अक्षरशः हाडे खिळखिळी होत आहेत. पर्यायी मार्गाने जाणे शक्य असले तरी त्यासाठी अधिक अंतर, वेळ आणि इंधन खर्च करावा लागतो. काही नागरिकांना या रस्त्यावर अपघात होऊन दुखापती झाल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळा संपेपर्यंत तरी तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी आणि त्यानंतर दर्जेदार व कायमस्वरूपी रस्ता उभारावा, अशी मागणी वाळकेवाडीसह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष काम करून आदिवासी भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

