कंधार/नांदेड, प्रतिनिधी| आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कंधार तालुक्यातील प्रति पंढरपूर बहाद्दरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम अय्यर यांच्या हस्ते तसेच श्री मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.


गेल्या अनेक वर्षांपासून पांचाळी मंगल कार्यालयाच्या वतीने वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी दिवसभर फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल संबंधित सेवाभावी कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.


तसेच विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या सुमारे तीन हजार नागरिकांचा स्वखर्चाने विमा उतरविण्याचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल स्वप्नील भगवान पेठकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



यावेळी दत्तात्रय कुरुडे, माजी सरपंच माधवराव पेठकर, हणमंत पेठकर, शंकर खरात, गुरू पाटील पेठकर, ग्रामविकास अधिकारी गिरी तसेच बौद्ध महासभेचे नवनियुक्त अध्यक्ष नामदेवराव जाभाडे यांचाही सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे दर्शनासाठी येणारे माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
यावेळी मुक्तेश्वर धोंडगे यांच्या पुढाकाराने बहाद्दरपूर येथून पंढरपूरकडे वारकऱ्यांचा जथ्था रवाना करण्यात आला. मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम अय्यर यांनी सर्व वारकरी आणि भाविकांना शुभेच्छा देत सुखरूप वारीची कामना व्यक्त केली. यंदा आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.

