नांदेड/हिंगोली| उमरखेड बायपास हायवेवर काही ट्राफिक पोलिस कर्मचारी वाहनधारकांना विनाकारण अडवून त्रास देत असल्याच्या तक्रारींनी वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण (Police’s arbitrary action on bypass? MP Ashtikar’s response to traffic..! ) निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अचानक त्या ठिकाणी धडक देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.


घटनास्थळी पोहोचताच चार-पाच वाहनधारकांना अडवून ठेवलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच खासदारांनी संबंधित ट्राफिक कर्मचाऱ्यांना रोखठोक शब्दांत जाब विचारत चांगलेच खडसावले. शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असताना ती सोडवण्याऐवजी बायपासवर वाहनधारकांना अडवून त्रास देणे कोणत्या नियमात बसते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


“जनतेला विनाकारण अडवणे, धाक दाखवणे किंवा त्रास देणे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा कडक इशारा देत खासदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तातडीने सूचना दिल्या. नागरिकांशी संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत वागण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.



दरम्यान, वाहनधारकांच्या तक्रारींवर तातडीने दखल घेत थेट घटनास्थळी पोहोचून प्रशासनाला जाब विचारण्याची खासदार आष्टीकर यांची कार्यशैली पुन्हा एकदा समोर आली. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून, ट्राफिक विभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

