नांदेड/हिंगोली| नांदेड परिसरातील बालाजी भक्तांना थेट तिरुपतीला जाण्यासाठी सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही मागणी लावून धरली आहे.


सध्या नांदेड–तिरुपती प्रवासासाठी थेट रेल्वेची सुविधा मर्यादित असल्याने भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी तिरुपतीला जातात. मात्र, थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


याच पार्श्वभूमीवर रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार केल्यास या भागातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल, तसेच व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही या मागणीला मोठा पाठिंबा मिळत आहे.



दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर ही मागणी मंजूर झाली, तर मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही सुविधा एक मोठी सोय ठरणार आहे.







