नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात उर्जा विभागासाठी सर्वाधिक २७ हजार ९६३ कोटी रुपये तर त्याखालोखाल सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २६ हजार २१८ कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित केल्याचा धागा धरून भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण असल्याचे म्हटले आहे.


त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, महिला, युवक अशा सर्वच समाजघटकांसाठी दिलासा देणारे निर्णय़ घेतल्याचे सांगितले. लाडकी बहीण योजना कायम सुरु ठेवण्याबाबत दिलेली ग्वाही, शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ,


स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांना महाविस्तार- एआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीकसल्ला देण्यासाठी ‘वसुधा’ व्हॉइसकॉल सेवा, गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजूरांचा समावेश, कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला गो-पालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम,


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा टप्पा-३ अंतर्गत २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे, १ हजार लोकसंख्या असलेल्या सर्व गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडणे, शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफटॉप सोलार योजनेत ५ लाख लाभार्थ्यांसाठी ६३५ कोटी रुपयांचे अनुदान, महिला बचत गटांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यास मान्यता आणि दिव्यांगाकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ टक्का निधी राखून ठेवण्याबाबतचे निर्णय महत्वपूर्ण असल्याचे आ. श्रीजया चव्हाण म्हणाल्या.


