हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे पोटा येथील ४५ शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर सातव्या दिवशी स्थगिती मिळाली. सलग आठवडाभर चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.


दरम्यान, सोमवारी हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले. गावातील लाभार्थ्यांची नव्याने निवड करून पात्र शेतकऱ्यांना योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल, असे स्पष्ट नमूद असलेले पत्र आंदोलकांना सुपूर्द करण्यात आले.


लेखी हमी हाती आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सातव्या दिवशी सुरू असलेले उपोषण मागे घेतले. मात्र, “आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडू,” असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


या घडामोडींमुळे आठवडाभरापासून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी प्रशासनाच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


