नांदेड| जिल्ह्यात आज इयत्ता १० वीची परीक्षा १७८ केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत ४४ हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी ४३ हजार ९४९ विद्यार्थी उपस्थित राहिले. उपस्थितीची टक्केवारी ९७.६८ इतकी नोंदविण्यात आली.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्ट, ड्रोन तसेच व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व १७८ केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त व शांत वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मात्र काही केंद्रांवर परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती परीक्षा कालावधीत परिसरात आढळल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब भारतीय न्याय संहिता कलम १६३ चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता १२ वी तसेच पुढील सर्व १० वी व १२ वीच्या पेपरदरम्यान परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिला आहे.


दरम्यान, सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी इयत्ता १२ वीच्या परीक्षेदरम्यान दहेली तांडा केंद्रास भेट दिली असता काही अनधिकृत व ओळखपत्र नसलेल्या व्यक्ती परिसरात फिरताना आढळून आल्या. या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रांवर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्ती त्या शाळेचे कर्मचारी किंवा संस्थेचे प्रतिनिधी असले तरी परीक्षेशी थेट संबंध नसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता १२ वीचा गणित विषयाचा महत्त्वाचा पेपर असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहूल कर्डिले यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असून विद्यार्थ्यां व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

