नांदेड,अनिल मादसवार| ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि महावितरणच्या ढिसाळ कारभारावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.


बैठक सुरू होताच आमदार कोहळीकर यांनी हदगाव–हिमायतनगरसह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीजप्रश्न मांडत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार सूचना व आदेश देऊनही परिस्थितीत सुधारणा होत नसेल, तर कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करा; अन्यथा मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकेन किंवा ही बैठक इथेच समाप्त करा, असा थेट इशारा त्यांनी दिला.


‘शहरी भागात माणसे, ग्रामीण भागात जनावरे राहतात का?’
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या लोडशेडिंगवर आमदारांनी संताप व्यक्त केला. “शहरी भागात माणसे राहतात आणि ग्रामीण भागात जनावरे राहतात का?” असा सवाल करत त्यांनी ग्रामीण जनतेशी वीजपुरवठ्याच्या बाबतीत भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित केला. लोडशेडिंग अपरिहार्य असेल तर रात्रीच्या वेळी ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित न करता दिवसा लोडशेडिंग करावी किंवा एक दिवस ग्रामीण भागात आणि एक दिवस शहरी भागात समान पद्धतीने वीजपुरवठा नियोजित करावा, अशी मागणी त्यांनी केली.



फोन न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांवरही संताप
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असलेले लाइनमन, अभियंते आणि संबंधित अधिकारी सामान्य नागरिकांचेच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचेही फोन उचलत नसल्याच्या तक्रारींवरून आमदार कोहळीकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जनता अंधारात आणि अधिकारी बेफिकीर—हा कारभार आता सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचा इशारा दिला. ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा जनतेच्या प्रश्नासाठी आणखी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
