Sunday, May 31

Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर

हदगाव, गौतम वाठोरे | येथील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे खेटे मारावे लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल पाटील रुईकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, वृक्ष लागवड, पानंद रस्ते, घरकुल, रमाई योजना तसेच पंतप्रधान घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रस्ताव मंजूर होऊनही निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तसेच तहसील कार्यालयात रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, पानंद रस्ते व शेती वहिवाटीचे रस्ते आदी कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “कार्यालयात चपला झिजतात, पण काम होत नाही,” अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा येत्या काळात उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल. प्रलंबित प्रकरणांची तातडीने छाननी करून संबंधित लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!