हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| सिरंजनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या यशस्वी कार्यकाळाच्या पूर्तीनिमित्त संत रोहिदास चौकात कृतज्ञता व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सरपंचांच्या कार्याची दखल घेतली.

कार्यकाळात राबविण्यात आलेले पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता अभियान, अंतर्गत रस्त्यांची कामे, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण व पारदर्शक कारभार यामुळे सरपंच मेघाताई करेवाड यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय व थेट संवादाची कार्यपद्धती विशेष कौतुकास्पद ठरली असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.


या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरपंच सौ. मेघाताई करेवाड यांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यासोबतच ग्रामपंचायत सदस्यांचाही त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी, “ग्रामस्थांनी दाखविलेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा गौरव व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाच्या विश्वासाचा आहे. कार्यकाळ संपला असला तरी गावाच्या सेवेसाठीची जबाबदारी कधीही संपणार नाही,” असे मनोगत व्यक्त केले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडेलू भाटे सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समस्त ग्रामस्थ सिरंजनी यांच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमानंतर पवन करेवाड मित्र मंडळाच्या वतीने ग्रामस्थांसाठी ग्राम भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कृतज्ञता सोहळा गावातील एकतेचे व विकासात्मक कार्याची दखल घेणारा ठरला असून, आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


