नांदेड, अनिल मादसवार| गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ शासकीय उपक्रम नसून लोकसहभागातून उभे राहणारे परिवर्तनाचे आंदोलन आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.


जिल्हा परिषद नांदेड येथील नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंढारकर, तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, नांदेड जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी अतिशय नियोजनबद्ध आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती व लोकसहभाग या मूलभूत घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावाला थेट पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, पंचायतराजच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रोत्साहनपर योजना आहे, असेही त्यांनी नमूद केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रभावी कामगिरीचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, अंगणवाड्या व शाळांचे नूतनीकरण, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसाठी विकास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


यावेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या वॉर रूमला भेट देत विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे बॅनर्स, कृती आराखडे व गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी उभारलेली प्रणाली पाहिली. या अभिनव व्यवस्थेचे त्यांनी विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, भूजल पातळी वाढविण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे एका दिवसात हजारो जलतारा खड्डे खोदण्यात आले आहेत. यासोबतच डिजिटल व स्मार्ट अंगणवाड्या, ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही, क्यूआर कोडद्वारे कर वसुली, आरोग्य शिबिरे, शाळा व अंगणवाड्यांची दुरुस्ती हे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

कॉन्फरन्स हॉलच्या नियोजनबद्ध नूतनीकरणासाठी कार्यकारी अभियंता संजय शिंदे, उपअभियंता बालाजी पवार, कंत्राटदार विकी शिकारे व अधिराज चिंचवडकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यावहारे यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

