बिलोली, गोविंद मुंडकर| मराठवाडा जनहित पार्टीची स्थापना करून भारतीय जनता पार्टीऐवजी या नव्या राजकीय पर्यायाच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका आता सर्वश्रुत झाली आहे. या पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला राजकीय पॅटर्न हा थेट भाजपच्या पारंपरिक वाटेपासून वेगळा असून, तो खासदार अशोकराव चव्हाण यांच्या संमतीनेच लढविण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बिलोली चे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची नुकतेच घडवून आणलेल्या भेटीवरून मराठवाडा जनहित पार्टी ही कोणत्याही अचानक उभी राहिलेली राजकीय ताकद नसून, त्यामागे सुसूत्र नियोजन आणि वरिष्ठ पातळीवरील सहमती असल्याचे अधोरेखित झाले आहे.


या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, मराठवाड्यातील राजकारणाची दिशा बदलण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.


नुकत्याच झालेल्या या भेटीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपली कन्या आमदार श्रीजया चव्हाण तसेच अमरनाथ राजूरकर यांना सोबत घेऊन बिलोली ते नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.
या माध्यमातून मराठवाडा जनहित पार्टीचा आता ‘यशस्वी पॅटर्न’ राबविण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे या पॅटर्नला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मिळालेली दखल ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र व राज्यसभा सदस्य अजित गोपछडे यांच्या बिलोली तालुक्यातील या राजकीय यशामध्ये त्यांचा सहभाग नसल्याचे त्यांच्या अनुपस्थितीवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत काही नेते जाणीवपूर्वक बाजूला ठेवले गेले का,? असा प्रश्न उपस्थित होत असून, यामुळे अंतर्गत राजकारणातील समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे.
एकंदर पाहता, मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा राजकीय प्रयोग भविष्यात मराठवाड्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपऐवजी नव्या पक्षाच्या माध्यमातून सत्ता-समीकरणे बदलण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

