हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीचे ढोल वाजत असताना रविवारी दुपारी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार शेख रफीक शेख मेहबूब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हदगांव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या साक्षीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.



कार्यक्रमाला काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते. शहरात आगमन होताच प्रदेशाध्यक्षांचे फटाक्यांच्या आतषबाजीने आणि घोषणाबाजीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि आता सोबत असणाऱ्यांनाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्याचे डावपेच रचले जात आहेत.”


ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पुन्हा सक्षमपणे उभी राहिली असून आज जनमत मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने आहे. भाजपच्या कटकारस्थानांना मतदारांनी ओळखून काँग्रेसला मतदान करावे, अशी विनंती त्यांनी केला. “हिमायतनगर शहराचा सर्वांगीण विकास केवळ काँग्रेसच करू शकते. आगामी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा नक्की फडकेल.” असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उमेदवार शेख रफीक यांनी एकजुटीचे आवाहन करत सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.


