देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असून, तिचे काटेकोर पालन करणे ही सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केले.


ते नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत देगलूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 संदर्भातील निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले, “आचारसंहिता ही केवळ प्रशासनिक बंधन नसून, लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा पाया आहे. तिचे पालन करणे प्रत्येक नागरिक, उमेदवार आणि पक्षाची जबाबदारी आहे.”

या वेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलम कांबळे, तसेच पोलीस निरीक्षक मारोती मुंडे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मुंडे यांनी सांगितले की, आचारसंहितेच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष एसएसटी पथके नेमण्यात आली आहेत. कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


पत्रकार परिषदेत नागरिक, पदाधिकारी आणि उमेदवारांना शांततामय व स्वच्छ निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलम कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व “देगलूर शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडेल,” असा विश्वास व्यक्त केला.


