Farmer Suicide : मारतळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या — सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे घेतले टोकाचे पाऊल

IMG 20251030 WA0094 Farmer Suicide : मारतळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या — सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे घेतले टोकाचे पाऊल

उस्माननगर (माणिक भिसे) नापिकी, अतिवृष्टी आणि वाढते कर्ज यामुळे शेतकरी वर्गात वाढत चाललेले नैराश्य पुन्हा एकदा उघड झाले आहे. लोहा तालुक्यातील मारतळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर गोविंद तरफेवाड (वय ४०) यांनी दि. २८ ऑक्टोबर मंगळवारी रात्री स्वतःच्या घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेनंतर पत्नी व शेजाऱ्यांनी तत्काळ गळफास काढून ज्ञानेश्वर यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर तरफेवाड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, मारतळा शाखेकडून पीककर्ज घेतले होते. मागील काही वर्षांपासून सततची नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीतील उत्पादन घटल्याने कर्जफेडीचा ताण वाढला होता. त्यातच मुलीच्या लग्नासाठी घेतलेले खासगी कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत ते सतत असायचे, असे नातेवाईकांनी सांगितले.

मंगळवारी रात्री पत्नी अंजना तरफेवाड (ग्रामपंचायत सदस्या, मारतळा) या बाहेर घरकाम करत असताना त्यांनी घरातच दरवाजा बंद करून आत्महत्या केली. आवाज ऐकून पत्नी आणि शेजाऱ्यांनी धाव घेत गळफास काढून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेले, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि मारतळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी अंजना, एक मुलगा, विवाहित मुलगी, सावत्र आई व भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अकाली गमावल्याने तरफेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top