India’s journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

britan 2 India's journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई| डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या महासत्तेच्या प्रवासात नैसर्गिक भागीदार असलेल्या ब्रिटनची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. फिनटेकचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आयुष्यात समृद्धीसाठी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भारताने अतिशय कुशलतेने तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल व्यवहारातून सुरक्षित, शाश्वत वित्तीय व्यवस्थेचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला भारतासोबत भागीदारी आणि जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या जागतिक महासत्तेच्या वाटचालीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक फिनटेक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर सहभागी झाले होते.

britan 1 India's journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
PM meets with the Prime Minister of the United Kingdom Mr. Keir Starmer in Mumbai, Maharashtra on October 09, 2025.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वित्त व्यवस्थेला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्याचा भारत प्रयत्न करीत आहे. डिजिटल वित्तीय व्यवहारांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि समावेशक बनवण्यासाठी ‘ एआय’ ची भूमिका निर्णायक ठरत आहे. भारताच्या कौशल्य, गुणवत्ता आणि नवोन्मेष क्षमतेमुळे भारतीय उत्पादने जगभरात स्पर्धात्मक ठरत आहेत. त्यामुळे भारत जागतिक पुरवठा साखळीचा एक मजबूत आणि विश्वासार्ह भाग बनला आहे. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळाली असून, जागतिक गुंतवणूकदार भारताकडे अधिक विश्वासाने पाहत आहे. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे, जे प्रत्येक नागरिकासाठी आणि देशातील प्रत्येक प्रदेशासाठी सुलभ आणि सहज उपलब्ध आहे.

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर म्हणाले, भारतासोबतची भागीदारी दोन्ही देशांच्या परस्पर प्रगतीला चालना देणारी असून ही सामायिक प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात आहे. यासाठी दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापक आर्थिक आणि व्यापार करारातून (CETA) निर्माण होणाऱ्या नव्या संधींवर भर दिला जाणार आहे. भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जलदगतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत आहे. भारताच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखाली वय असणाऱ्यांची आहे. या देशाची ऊर्जा आणि क्षमता विशेषतः मुंबईत स्पष्टपणे दिसते.

तसेच, जेव्हा ही क्षमता ब्रिटन सोबत एकत्र येईल, तेव्हा ‘ यूके’ फिनटेक नवकल्पनांसाठी आणखी उत्तम केंद्र बनवता येईल. डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत. तसेच जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी जलद परवाना प्रक्रिया आणि नवीन व्हिसा मार्ग सुरू करत आहोत. या महोत्सवाच्या माध्यमातून व्यवसाय व रोजगार यासाठी फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील नवोन्मेषकार, धोरणकर्ते, केंद्रीय बँकांचे प्रतिनिधी, नियामक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top