उस्माननगर (प्रतिनिधी) कंधार तालुक्यातील उस्माननगर (मोठी लाठ) येथील हिंदू वैकुंठ स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेमुळे शोकाकुल कुटुंबांना अंत्यसंस्कारावेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच आपल्या मामाच्या अंत्यसंस्कारावेळी आलेला विदारक अनुभव एका सामाजिक जाणिवेतून अतुल सुरेशराव सुपेकर या तरुणाने थेट जिल्हाधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.


काय आहे नेमके प्रकरण? – अहिल्यानगर येथील रहिवासी असलेले अतुल सुपेकर यांचे मामा — आदर्श शिक्षक म्हणून परिचित स्व. विश्वासराव लोखंडे गुरुजी (वय ८४) यांचे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार ७ ऑक्टोबर रोजी उस्माननगर स्मशानभूमीत करण्यात आला. यावेळी लोखंडे कुटुंबीयांना व उपस्थित नागरिकांना स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.

स्मशानभूमीची भयावह परिस्थिती – अतुल सुपेकर यांनी आपल्या निवेदनात स्मशानभूमीच्या खालील गंभीर समस्या अधोरेखित केल्या आहेत: नादुरुस्त शेड: अंत्यविधीचे पत्र्याचे शेड पूर्णपणे गंजलेले व सडलेले असून पावसात आत पाणी गळते. भर पावसात अंत्यसंस्कार करणे कठीण बनते. अस्वच्छ परिसर: मोठ्या प्रमाणात गवत, कचरा, बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रस्ता नाही: स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. अतिवृष्टीमुळे नागरिकांना चिखलातून, शेतातून मार्ग काढत यावे लागते. मानसिक व शारीरिक त्रास: शोकाकुल अवस्थेत नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो.


“मामांना श्रद्धांजली म्हणून स्मशानभूमीची सुधारणा हवी” “आम्ही जो त्रास सहन केला तो भविष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नये. स्मशानभूमीचे आधुनिकीकरण होणे हीच माझ्या मामांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अतुल सुपेकर
प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या: स्मशानभूमीची तातडीने पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणे. शेड दुरुस्त करून नवीन पत्रे बसवणे, रंगरंगोटी व परिसर सुशोभीकरण. गवत व कचरा पूर्णपणे काढून स्वच्छता करणे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करणे.
मुख्यमंत्री कार्यालयालाही निवेदन – अतुल सुपेकर यांनी केवळ वैयक्तिक अनुभव न मांडता, एक गंभीर सामाजिक समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. हे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले आहे. त्यामुळे या प्रकरणावर प्रशासन कोणती तातडीची पावले उचलते, याकडे उस्माननगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. “स्मशानभूमी हे दुःखाच्या क्षणी आधाराचे ठिकाण असते. तेच जर त्रासाचे कारण ठरले, तर ही दुर्दैवी बाब आहे. शासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशी नागरिकांची मागणी आहे.


