नांदेड l माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी गुरुवारी मुदखेड तालुक्यातील मुगट, आमदुरा, खडकूत, देळूब बु. परिसरात पूरग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर आ. श्रीजया चव्हाण यांनी रोही पिंपळगाव व माळकौठा भागातही पाहणी केली.


महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जायकवाडी व विष्णुपुरी धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदी व आसना नदी तुडूंब भरून वाहत असल्यामुळे मुदखेड – ब्राह्मणवाडा मार्गै नांदेडकडे जाणारा रस्ता दोन दिवसापासून बंद झाला आहे.

मुदखेड तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करताना खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनीही खरडून गेल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर सातत्याने नैसर्गिक संकटे ओढवली आहेत. त्यांना अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.


या पाहणी दौऱ्याच्या वेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेटी, तहसीलदार आनंद देऊळगावकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, भीमराव पाटील कल्याणे, उद्धवराव पवार, माधव कदम, युवराज पाटील, रमेश कल्याणे, गणेशराव येळमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


