नांदेड l शहरात गेल्या महिन्यात १८७ मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहरातील सखल भागात, नदी काठावर व नाल्याच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून कपडा लता, अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. महिना उलटला तरी अजून सर्वेक्षण व मागील वर्षाचे अनुदान पीडितांच्या बॅंक खात्यात वर्ग झाले नाही. वंचीत आणि भीम आर्मी च्या वतीने देखील लक्षवेधी आंदोलने मनपा,तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर झाली आहेत.


सीटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने मागील दोन वर्षात ४५ आंदोलने करून निधी खेचून आणला आहे. मात्र खऱ्या पूरग्रस्तांना डावलले जात असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे सीटू संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या वतीने सादर केलेल्या यादीतील पूरग्रस्तांच्या घरी जाऊन गृहपाहणी करावी ह्या मागणीसाठी संघटना आग्रही आहे.यासाठी हे ४६ वे आंदोलन करण्यात आले. तहसील व मनपाचा समन्वय नसल्याने खरे पूरग्रस्त सानुग्रह अनुदानापासून वंचित राहत आहेत. यासाठी सीटूच्या वतीने राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.

शासनाच्या आदेशानुसार तात्काळ सर्वेक्षण व पंचनामे केले पाहिजे परंतु मागच्या वर्षीप्रमाणेच सरसगट पंचनामे न करता मोचक्या व प्रतिष्टीत लोकांच्या सूचनेनुसार यादीत नावे टाकण्यात येत आहेत.या विरोधात ३ आणि १० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न मजदूर युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करीत पाच तास धरणे आंदोलन करण्यात आले.


यावर्षी सुधारित जिल्हाधिकारी आदेशानुसार मनपा कडे पंचनामे व पात्र यादी करण्याची जबाबदारी देण्यात आल्यामुळे दि. २२ सप्टेंबर रोजी प्रचंड घोषणाबाजी करत महापालिका मुख्य कार्यालयास घेराव घालण्यात आला व मागण्याची पूर्तता झाली नाहीतर नवरात्र मध्ये नऊ दिवस मनपा समोर साखळी उपोषण करण्याचा निर्धार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

नऊ दिवसात गेल्या वर्षीचे अनुदान पडले नाही किंवा यावर्षीच्या पात्र पूरग्रस्तांच्या यादीत सीटूने सादर केलेल्या यादीतील पीडितांचे नावे समाविष्ट केली नाहीत तर ३० सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीटूच्या वतीने देण्यात आला आहे.वसुली लिपिक व तलाठी हे माजी नगरसेवक किंवा प्रतिष्ठित ठेकेदाराच्या दबावाखाली येऊन मोचक्या लोकांची नावे पूरग्रस्त म्हणून पात्र ठरवीत आहेत.हा प्रकार गंभीर असून त्यात सुधारणा करून सरसगट पूरग्रस्तांना अनुदान मंजूर करावे या मागणी साठी जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेच्या पुढाऱ्यांची भाषणे झाली.
या आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड,जमसं च्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. सुंदरबाई वाहुळकर कॉ.अजिजूर रहेमान आदींनी केले. उपरोक्त आंदोलनामध्ये हजारोच्या सख्येने पूरग्रस्त सामील झाले होते. सादर केलेल्या यादीतील ४ हजार पूरग्रस्तांच्या घराची गृहपाहणी केली नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

