हिमायतनगर, अनिल मादसवार| गणेशोत्सवाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले असतानाच शहरात सतत पावसाचे वातावरण असूनही गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम आहे. युवकांसाठी या उत्सवाला वेगळे महत्त्व असताना, महावितरण विभागाकडून मात्र वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे. “केवळ हिंदू सण आलेकीच वीजपुरवठा खंडित होतो का?” असा थेट सवाल गणेशभक्त युवकांकडून विचारला जात आहे.


हिमायतनगर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, पोलीस ठाणे हद्दीत शहरातील सुमारे २५ गणेश मंडळांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत गणपती बाप्पाची मनोभावे महाआरती आणि प्रसाद वितरण कार्यक्रम होतो. मात्र या धार्मिक सोहळ्यांदरम्यान वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा भक्तांच्या संतापाचा विषय ठरत आहे.

गणेशभक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे गणेश मंडळांचे कार्यक्रम विस्कळीत होत आहेत. या कारभाराविरोधात गणेशभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “गणपती बाप्पाच्या उत्सवाला अजून सात दिवस शिल्लक आहेत, तरीही हीच परिस्थिती राहिली तर आम्ही महावितरण कार्यालयावर धडक देऊ”, असा इशारा भक्तांनी दिला आहे.


हिमायतनगरात सर्व धर्मियांचे उत्सव मोठ्या आनंदात एकत्र येऊन साजरे केले जातात. मात्र महावितरण विभागाच्याच हलगर्जीपणामुळे या उत्सवात विघ्न येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लवकरच माता गौराईचे आगमन होणार असून, ही बाब लक्षात घेता महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी भक्तांकडून जोर धरू लागली आहे.


