हिमायतनगर, अनिल मादसवार| “जय जवान जय किसान… जान देंगे जमीन नहीं” जमीन आमच्या हक्काची नाहीं कुणाच्या बापाची…. या घोषणांनी कामारी परिसर दणाणून गेला. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प पैनगंगा धरणाच्या विरोधात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे रविवारी (दि.२४ ऑगस्ट) भव्य महाएल्गार सभा आठ दिवसाखाली झालेल्या अतिवृष्टीच्या पुराणे गावाला वेढा घातला त्याच हनुमान मंदिर परिसरात पार पडली. यावेळी धरण म्हणजे तुमचं आमचं मरण आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या असे आवाहन करण्यात आले. तसेच निगनूर येथे होणार सहस्रकुंड जलविददूत प्रकल्प हद्दपार करा, मिटवून टाका, बंद करा, आणि पर्याय शोधून सिंचनाचा प्रश्न सोडवा, नदीवर 10 किमीवर बैरेजेस बांधा, सोलर मधून विज उत्पन्न करा, असा संदेश शासनाला प्रमुख मार्गदर्शक वक्त्यांनी दिला.



हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील कामारी गावात संपन्न झालेल्या महाएल्गार सभेच्या अध्यक्षस्थानी कोंडाबाराव शिरफुले हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रल्हादराव जगताप पाटील, अध्यक्ष – निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती (विदर्भ-मराठवाडा), मुबारक तवर, प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती तथा माजी उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषद, प्रल्हाद गावंडे सर, डॉ अविनाश खंदारे, डॉ. रेखाताई पाटील चव्हाण, प्रकाश पेंदे, दिनेश रावते, प्रा. संध्याताई कदम, चक्रधर पाटील देवसरकर, यांनी विराजमान होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सभेला प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, स्वराज्य पक्षाचे माधवराव पाटील देवसरकर, कृष्णा पाटील आष्टीकर, गायक सुनील चव्हाण यांनी गीत सादर करून शेतकऱ्यांना जागे करण्यासाठी प्रयत्न केला.



सभेत विविध वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणातून सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली. होऊ घातलेल्या या प्रकल्पामुळे नदीकाठच्या जवळपास ४० गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक शेती जमिनी पाण्याखाली जाणार आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत “शेतकरी राजा जागा हो, सहस्त्रकुंड प्रकल्प रद्द झाला पाहिजे” असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेला विदर्भ-मराठवाड्यातील बुडीत क्षेत्रातील हजारो शेतकरी, शेतमजूर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धारण विरोधी संघर्षाला पाठिंबा दिला.



एकूणच मागील सिरपल्लीच्या सभेनंतर हि दुसरी महाएल्गार सभा कामारी येथे पार पडली असून, या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले असल्याचे दिसून आले आहे. जुने प्रकल्प अजून अर्धवट असताना नवीन प्रकल्प करून अगोदरच ओलीत असलेल्या जमीनिला ओलीत करण्याचा घाट रचून धरण करण्याचा प्रयत्न होतो असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच आगामी काळात होणाऱ्या धरण विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीला सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धरणाला कडाडून विरोध करावा. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी समिती तयार करून धरणाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यासाठी समितीने काम करावे असे आवाहनही करण्यात आले. आजच्या महाएल्गार बैठकीचे आयोजन कामारी येथील शेतकऱ्यांनी केले होते.


