नांदेड| नांदेड जिल्हयाच्या राजकारणात साडे तीन-चार दशके सक्रीय असलेले राज्य गृह व वित महामंडळाचे माजी अध्यक्ष व संचालक जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, या व अशा विविध पदावर राहिलेले प्रचंड लोकसंग्रह असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव विश्वनाथअप्पा भोसीकर यांची दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी मंगळवारी (२७ मे) रोजी निधन झाले. पानभोसी ( ता कंधार) येथे बुधवार सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


नव्वदीच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात कुंटुरकर गोरठेकर, भोसीकर, चिखलीकर यांचा जिल्हा परिषदेच्या राजकारण व प्रशासनात दबदबा होता. हरिहरराव भोसीकर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८० मध्ये कंधार तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदापासून झाली. हरिहरराव भोसीकर यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, कृषी व पशुसंवर्धन सभापती, तसेच राज्याच्या गृह व वित महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांनी तीन वेळा जिल्हा मध्यवर्ती सहकारी उपाध्यक्ष पद भूषविले होते.


१९८२ मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस- पं. स. कंधार सदस्य ,१९९२ ९५ या काळात कंधार तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष .कलंबर सर्कल ९२ ते ९७ जि.प. सदस्य, १९९५-२००२- कुरुळा सर्कल जिल्हा परिषद सदस्य – २००३ ते २००८- बहादरपुरा जि प सदस्य १९९७-२००० – जिल्हा बँकेचे पहिल्यांदा उपाध्यक्ष, १९९७ जि.प.उपाध्यक्ष आँगस्ट २००० – राज्याच्या गृह व वित् महामंडळाचे अध्यक्ष जानेवारी 2000 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 200४ मध्ये कंधार विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली.. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राज्य प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले.


संपूर्ण जिल्हयात त्यांच्या कार्याची ओळख होती. देशाचे माजी गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण,याच्या सोबत त्यांनी सुरुवातीला काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विश्वासू म्हणून ते परिचित होते. प्रतापराव – हरिहरराव ही जोडगोळी नव्वदच्या दशकात जि.प. मध्ये प्रसिद्ध होती. कुंटुरकर गोरठेकर – टाकळीकर – भोसीकर यांच्यातील मैत्री होते. मित्रभाषी व मोठा लोकसंग्रह आणि कामाचा प्रचंड ऊर्जा असलेले हरिहरराव भोसीकर याचे राजकीय कारकीर्द मध्ये चढ उतार चालू होते. शेवटच्या टप्प्यात आजारामुळे त्याचा संपर्क कमी झाला पण पक्ष कार्य सुरूच होते.

मंगळवार २७ मे रोजी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यांच्या पश्चात पत्नी मुलगे शिवकुमार , बाळासाहे व नितीन हे तीन मुलगे स्नूषा, नानु भाऊ, पुतणे, भावत्रयी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे लोहा- कंधार तालुक्याची मोठी राजकीय हानी झाली.


