हिमायतनगर। तालुक्यात शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान हिमायतनगर शहरातील रहिवासी असलेले शेतकरी अजगर खान मिया खान वय ६२ वर्ष यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शहर परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते.

नांदेड जिल्ह्यात शुक्रवार पासून वातावरणात बदल झाला असुन, ढगाळ वातावरणामुळे वादळी वारे, विजांचा कडकडाट, होऊन मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडतो आहे, शनिवारी हिमायतनगर (वाढोणा) शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य कमानीखाली व सखल भागात पाणीच पाणी झाले होते. नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील अनेक सखल भागात नालीचे दुर्गंनधीयुक्त पाणी रस्त्यावर साचले असल्याचे पहावयास मिळत आहे. नगरपंचायत प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करावी अशी मागणी केली जाते आहे.

सायंकाळी झालेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट सुरू झाला यावेळी हिमायतनगर शहराजवळील शेतीत शेतकरी अजगर खान मिया खान हे अल्पभुधारक शेतकरी पेरणीपूर्वी मशागतीच्या कामाकरीता शेतात दिवसभर होते. दुपारी अचानक पाऊस व वीजांचा कडकडाट होत असल्याने ते घराकडे निघण्याच्या तयारीत निघाले होते.


दरम्यान अचानक विजेचा कडकडाट झाला व त्याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच तलाठी पुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला, अशी माहिती त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.


