Wednesday, May 13

Collector Abhijit Raut : सामाजिक सौहार्द, शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे: जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड| जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजातल्या सर्व सज्जन व शांततवादी शक्तिने एकत्रितपणे काम करावे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रशासनाची मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दि.12 डिसेंबर रोजी केले. परभणीच्या घटनाक्रमा नंतर आज नांदेड येथे शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये हे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. शहरात शांतता राखण्यासाठी येथील सर्व समाजातील बांधवांनी कायम सहकार्य केले आहे. परभणी येथील घटना निषेध करण्यासारखी आहे. मात्र त्याच्या चुकीच्या, वाईट प्रतिक्रिया कुठे उमटू देऊ नका. सामाजिक जबाबदारीतून चांगले ते स्विकारू वाईट ते सोडू असे सांगून जिल्ह्यातील शांतता अबाधित राहील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची आढावा बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलीस अधिक्षक कृतिका, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, समिती सदस्य दुष्यंत सोनाळे, भन्ते पय्याबोधीजी, महमद वसिम म.कासिम, नंदकुमार कुलकर्णी यांच्यासह विविध सदस्य, समाजातील मान्यवर नागरिक आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोणतीही वाईट घटना घडू नये यासाठी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. भारतीय संविधानाचा जिल्ह्यात चांगला प्रचार प्रसार केला जाईल. ही लोकचळवळ झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.नांदेडमध्ये संविधान भवन उभारण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर दिला असून लवकरच संविधान भवन नांदेडमध्ये होईल,असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

WhatsApp Image 2024 12 12 at 8.07.40 PM Collector Abhijit Raut : सामाजिक सौहार्द, शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे: जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

समाजातील नागरिक पोलिसांसोबत असेल तर वाईट कृत्य नांदेडमध्ये कुठेही घडणार नाही. नांदेडमधील चांगल्या परिस्थितीबाबत यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी माहिती दिली.जिल्ह्यात शांततेबाबत चर्चेतून नियेाजन केले जात आहे. शांतता समितीच्या या बैठकीत दिलेल्या विविध सूचना वरिष्ठांना शासनाला दिल्या जातील. परभणी येथील घटनेनंतर काही बाबींवर आपल्या सर्वांना नियंत्रण ठेवावे लागणार आहे. सार्वजनिक व व्यक्तिगत मालमत्तेची कुठेही हानी होणार नाही याअनुषंगाने प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मोर्चा, आंदोलनाबाबत प्रशासनाला माहिती देऊन ती समन्वय ठेवू करावीत. त्यासाठी आवश्यक ते संरक्षण पोलिसांकडून दिले जाईल. बंदमुळे गोरगरीब, छोट्या व्यापाऱ्याचे मोठे नुकसान होते त्यामुळे नागरिकांनी बंद पुकारू नये. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहिल यासाठी पोलीस 24 तास आपल्यासोबत असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात शांतता राहण्यासाठी सर्वांनी महामानवांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाच्या मार्गांने प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी सर्व उपस्थितांनी दिली.शेवटी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून सर्वांनी शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!