नांदेड| “प्रत्येकाला आपल्या मराठी बोली भाषेचा अभिमान वाटला पाहिजे,” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भाषा विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. पुढे बोलताना डॉ. पृथ्वीराज तौर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “स्पर्धा परीक्षांसाठी शब्दांची निवड आणि भाषेचा अचूक वापर केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ होते.”


कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील उपयोग आणि तिची अभिव्यक्ती यावर आपले विचार व्यक्त केले. मराठी भाषा व तिच्या साहित्यसंपदेचे प्रदर्शन नांदेड जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती प्रतीक्षा तालंगकर यांनी “मराठी भाषा अभिजात कशी ठरली” यावर सविस्तर विवेचन केले.



ज्येष्ठ साहित्यिक बापू दासरी यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि लेखनशैलीतील भूमिका यावर विचार मांडले. त्यांनी रोजनिशी लेखनाचे महत्त्व अधोरेखित करत, भाषा प्रगल्भतेकडे नेणारा मार्ग म्हणून त्याचे उदाहरण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी आभार मानले. या प्रसंगी विकास बिरादरी, विधिज्ञ पिंपरखेडे, ज्येष्ठ लेखक लक्ष्मण संगेवार, श्रीमती प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, बाळू पावडे, उत्तम घोरपडे, राजीव पाटील, रघु श्रीरामवार यांच्यासह वाचक, अभ्यासक, विद्यार्थी व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


पेन्शन अदालत मंगळवारी
शासनाच्या सूचनेनुसार माहे ऑक्टोबर २०२५ मधील दुसऱ्या मंगळवारी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालात आयोजित करण्यात आली आहे. सदर अदालातासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत हजर राहावे. नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांनी पेन्शन संबंधित अडचणी, तक्रारी व मागण्या सदर दिवशी हजर राहून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


