किनवट, परमेश्वर पेशवे| बोधडी (बु.) खून प्रकरणातील मुख्य आरोपी दयानंद जायभाये यास अटक होताच अवघ्या काही तासांत खून प्रकरणातील अन्य तीनही आरोपींना जेरबंद करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. मोबाइलच्या तांत्रिक माहितीवरून राम केंद्रेच्या खुनाचा उलगडा झाला. प्रॉपर्टीच्या कारणावरून मेव्हण्यानेच इतर तिघींच्या मदतीने भावजयीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे.


बोधडी (बु.) गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील आखाड्यावर राम महादेव केंद्रे (३८) व त्यांची आई गयाबाई (६०) हे १३ जुलैच्या रात्री झोपी गेले होते. रात्री ९:३० ते १०:०० वाजेच्या सुमारास ‘राम राम’ असा आवाज आला. आई- भावजयीचा आवाज आहे, म्हणत राम आवाजाच्या दिशेने गेला. तेव्हा चार जणांनी मारहाण सुरू केली. या मारहाणीत राम यांचा मृत्यू झाला. तर गयाबाईचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गयाबाईने मोठ्या हिमतीने एकाच्या पाठीत काठी घातली. त्यात एकाच्या पाठीवर काठीचा मार असल्याने तिसऱ्या दिवशी पाठीवर वळ दिसून आले. मयत राम महादेव केंद्रे हा मूळचा उदगीर तालुक्यातील. तेथील शेती विकून तो बोधडी (बु.) येथे आला आणि दोघा भावांत दहा एकर शेती घेतली.


मयताची सासुरवाडी सावरी येथील असून, मयत राम हा शेती विकून बोधडी गाव सोडून जाणार होता, तशा हालचाली सुरू झाल्या. याची कुणकुण आरोपी मेव्हणा दयानंद जायभाये याला लागली. शेती घेताना मयत भावजीला मेव्हण्याने मदत केली होती. एकतर बहिणीला दोन वर्षांपासून वागवत नव्हता. बहीण पण भावजीकडे नाही आणि शेती विकून गेला, तर कसे होईल, असा संशय त्याच्या मनात होता.

पाठीवरील वळाने पटली ओळख
त्यानुसार दयानंदने १३ जुलै रोजी रात्री गणेश मनोहर मुसळे (२७), राजू गणेश गडेकर (२४), नागेश उत्तम कराड (३३), सर्व राहणार बोधडी (बु.) यांना सोबत घेत राम केंद्रे यांच्या आखाड्यावर गेला आणि भावजी रामचा मेव्हणा दयानंदने काटाच काढला. यावेळी गयाबाई यांनी एकाच्या पाठीवर काठी मारली होती. त्याच्या वळावरून ओळख पटली.
पोलिस खाक्या दाखवताच दयानंद बोलता झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी दिली. चारही आरोपींना किनवटच्या न्यायालयात हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
