नांदेड| पावसाचे प्रमाण कमी होत असताना पारंपरिक शेतीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्यातही चांगले व शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले.


‘मेरा रेशीम, मेरा अभिमान’ या उपक्रमांतर्गत सांगवी (क) येथे आयोजित रेशीम शेती कार्यशाळेत ते बोलत होते. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत कमी पाण्यात उत्पादन घेण्याची क्षमता असल्याने रेशीम शेती हा पारंपरिक शेतीला चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यवसायाचा गांभीर्याने विचार करावा, असे डॉ. ढवळे यांनी सांगितले.


प्रति एकर १ ते २ लाखांपर्यंत उत्पन्न – जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी रेशीम शेतीच्या आर्थिक फायद्यांची माहिती दिली. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास प्रति एकर १ ते २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, तर कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
तांत्रिक अडचणींवर विभागाचे सहकार्य – केंद्रीय रेशीम मंडळाच्या वैज्ञानिक बी डॉ. अंतरा गुप्ता यांनी रेशीम शेतीतील विविध तांत्रिक बाबींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रेशीम उत्पादनादरम्यान येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी रेशीम विभागाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तालुका कृषी अधिकारी सोनकांबळे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्राप्त प्रस्तावांना लवकर मान्यता देऊन अनुदान वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले. कार्यशाळेला रेशीम कार्यालयाच्या क्षेत्र सहायक कांचन जाधव, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नांदेड जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेलगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मनमत काळे यांनी रेशीम विभागाचे आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले.

