हिमायतनगर, प्रतिनिधी| भूमी अभिलेख कार्यालय, हिमायतनगर येथे बोरगडी येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी अतिरिक्त २० हजार रुपयांची मागणी करून पैसे घेतल्याचा, तसेच पैसे दिल्यानंतरही संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने ते पैसे घेतले नसल्याचे सांगत एका ७५ वर्षीय शेतकऱ्याशी बुटाने मारण्याची भाषा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्तुळात संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी भूमिभिलेख कार्यालयात अनेक शेयकऱ्यांना घेऊन धडक देत केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बोरगडी येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी संबंधित शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयात प्रक्रिया केली होती. अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि ती रक्कम घेतली गेल्याचा आरोप संबंधित वृद्ध शेतकऱ्याने केला आहे. मात्र, नंतर संबंधित व्यक्तीने पैसे घेतले नसल्याचे सांगत वृद्ध शेतकऱ्याशी अर्वाच्य व अपमानास्पद पद्धतीची भाषा वापरत अपमानित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.



एकीकडे शासन शेतकऱ्यांना न्याय, सन्मान आणि पारदर्शक प्रशासन देण्याची भूमिका मांडत असताना, दुसरीकडे शासकीय कार्यालयातच ७५ वर्षीय शेतकऱ्याला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळत असल्यास ही गंभीर बाब आहे. वृद्ध शेतकरी हा प्रशासनाचा त्रास सहन करण्यासाठी नसून, त्याला न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी व्यक्त केली.



या प्रकरणातील भूमिअभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अतिरिक्त पैशांची मागणी झाली का, रक्कम स्वीकारण्यात आली का तसेच वृद्ध शेतकऱ्याशी अपमानास्पद भाषा वापरण्यात आली का, याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
“वृद्ध शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका वामनराव पाटील वडगावकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत भूमी अभिलेख विभागाची अधिकृत बाजू समोर आली नाही.

