नांदेड| महान समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यभर विविध शेतकरी व पशुपालक हितोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांचे सविस्तर वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत.


या उपक्रमांतर्गत जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान गायी व म्हशींमधील वंध्यत्व तपासणी व निवारणासाठी विशेष शिबिरे घेण्यात येतील. मार्च २०२७ ते एप्रिल २०२७ या कालावधीत पशुसंवर्धन क्षेत्रातील आधुनिक तांत्रिक माहिती व मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.


जंतनिर्मूलनासाठी विशेष मोहीम – जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास वजन घटणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे तसेच विविध आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून उपलब्ध करून देण्यात आलेल्या औषधांचा वापर करून गावागावात जंतनाशक शिबिरांच्या माध्यमातून नियमित जंतनिर्मूलन करण्यात येणार आहे.
वंध्यत्व तपासणी व उपचार – दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी जनावरांचे नियमित वेत होणे आवश्यक आहे. वंध्यत्वामुळे प्रतिवर्षी वेत न मिळाल्यास पशुपालकांचा संगोपन खर्च वाढतो. यासाठी विशेष शिबिरांमध्ये गायी व म्हशींची वंध्यत्व तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.
तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन – आधुनिक पशुसंवर्धन पद्धती, पशुधन व्यवस्थापन आणि उत्पादकता वाढीसाठी प्रत्येक गावात तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना निमंत्रित करून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत. या मोहिमेमुळे राज्यातील पशुपालकांना दिलासा मिळून पशुधनाचे आरोग्य सुधारण्यासह उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.



पशुवैद्यकीय सेवांसाठी हेल्पलाइन : १९६२
व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा : ९०६३१४२२९९
“ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे, जनावरांचे आरोग्य सुधारणे आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील सर्व पशुपालकांनी या शिबिरांचा व उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
— डॉ. किरण पाटील, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य

