नांदेड, प्रतिनिधी| एक शिक्षक… दोन चिमुकली मुले… आणि मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर केलेले गंभीर आरोप! या धक्कादायक घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भोकर तालुक्यातील बेंबर येथील रहिवासी आणि हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या १२ वर्षीय मुलगी सारा आणि ८ वर्षीय मुलगा सुमित यांच्यासह गोदावरी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना १७ जुलै रोजी समोर आली.


सकाळी साडेसातच्या सुमारास मोरे हे आपल्या वाहनातून मुलांसह मुगट पुलावर आले आणि नदीत उडी घेतल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफ पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.


शेवटच्या स्टेटसमध्ये कुणाची नावे? – या घटनेनंतर सुनील मोरे यांनी मृत्यूपूर्वी ठेवलेल्या कथित व्हॉट्सॲप स्टेटसने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीतील चौकशा, तक्रारी आणि कथित मानसिक त्रासाचा उल्लेख करत त्यांनी काही शिक्षण विभागातील अधिकारी व एका सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होत असल्याचा दावा केल्याचे समोर आले आहे. या स्टेटसमधील आरोप खरे आहेत का? त्यामागे नेमकी पार्श्वभूमी काय? मोरे यांच्यावर खरोखरच प्रशासकीय दबाव किंवा मानसिक छळ होता का? या सर्व प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होणे आता अत्यावश्यक बनले आहे.



‘व्यवस्थेने एका कुटुंबाला मृत्यूच्या दारात ढकलले का?’ – एका शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह टोकाचे पाऊल उचलणे ही केवळ कौटुंबिक शोकांतिका म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी घटना नाही. मृत्यूपूर्वी केलेल्या कथित आरोपांमुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी असलेल्या यंत्रणाच जर मानसिक त्रासाचे कारण ठरत असतील, तर शिक्षकांनी न्याय मागायचा कुठे? असा संतप्त सवाल आता शिक्षक वर्तुळातून उपस्थित होत आहे.
दरम्यान, मृत्यूपूर्वीच्या स्टेटसमधील प्रत्येक आरोपाची स्वतंत्र चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी, मागील तक्रारी व चौकशीची कागदपत्रे तपासणे आणि या शोकांतिकेमागील सत्य जनतेसमोर आणणे, अशी मागणी होत आहे. तीन मृतदेह नदीतून बाहेर आले; मात्र या घटनेने शिक्षण व्यवस्थेतील अनेक अनुत्तरित प्रश्न पुन्हा पृष्ठभागावर आणले आहेत. आता हळहळ नको—सत्य बाहेर यावे आणि दोषी कोणीही असो, कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.
