महाविकास आघाडीत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये – खा.नागेश पाटील आष्टीकर – NNL
प्रज्ञा सातव, सुभाष वानखेडे आणि जयप्रकाश मुंदडा यांनी महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप

नांदेड,अनिल मादसवार| नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत राहून पक्ष विरोधी काम करणाऱ्याच्या विरोधात पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक काळात महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव, सुभाष वानखेडे आणि जयप्रकाश मुंदडा यांनी महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात काम केले आहे. असा गंभीर आरोप एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून हिंगोली लोकसभा नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे.


नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत राहून पक्ष विरोधी काम करणाऱ्याच्या विरोधात खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्र देऊन तक्रार केली आहे. निवडणूक काळात महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराच्या विरोधात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या प्रज्ञा सातव यांनी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या हिताच्या विरोधात काम केले. त्यांनी पक्षाचे निर्देश पाळले नाहीत आणि विरोधकांना पाठिंबा दिला. अशी तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करून सातव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडीकडून पुन्हा संधी दिल्यास आमदार मतदान करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की, प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे मला त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी तक्रार करावी लागली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात येऊ नये, दिल्यास तो निष्ठावंतावर अन्याय केल्यासारखे होईल. महाविकास आघाडीकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा बी फॉर्म लागला नाही पाहिजे. तसं जर झालं तर आम्ही त्यांचं काम करणार नाही किंवा आमचे आमदार त्यांना मतदान देणार नाही असे त्यांनी माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.


माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिंदे गटात प्रवेश केला यावर बोलताना ते म्हणाले कि, कदाचित त्यांना माहित झाले आहे की आतापर्यंत तिन वेळा आपण पक्षविरोधी काम केली आहेत. हि तिसरी वेळ असल्याने आपला येथे निभाव लागणार नाही… उद्धव साहेब काही माफ करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे पक्ष प्रवेश केला असेल असेही ते म्हणाले. तसेच सुभाष वानखेडे यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या ठिकाणाहून उमेदवार दिले तिथून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. याबाबतचा प्रश्न विचारतात खासदार नागेश पाटील म्हणाले की. तुम्ही पक्ष विरोधी काम करताल आणि पुन्हा पक्षाकडे तिकीट मागसाल असं कस जमेल…. त्यासाठी आपणही मग पक्षाचं काम करायला पाहिजे ना… असे ते म्हणाले. एकूणच लोकसभा निवडणुक संपताच महाविकास आघाडीत राहून पक्षविरोधी काम केलेल्या सहकाऱ्यांचा समाचार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतला. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकरून नांदेड / हिंगोली जिल्ह्याच्या विविध विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की…? पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




