बिलोली| सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात मुलांना केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर उत्तम संस्कार मिळणेही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर यांनी केले.

ते बिलोली येथील सरस्वती प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

मुंडकर पुढे म्हणाले की, “आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या मार्गाने जावी, त्यांना चांगले संस्कार लाभावेत यासाठी आई-वडील नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र मुलांना चांगले संस्कार देणे ही केवळ पालकांचीच जबाबदारी नसून शाळांचीही तेवढीच जबाबदारी आहे. शिक्षणासोबतच मूल्यशिक्षण दिल्यास विद्यार्थी जीवनात नक्कीच यशस्वी ठरतात.”


विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, “जीवनात सगळ्यांना विसरा, पण आई-वडील आणि चांगले गुरु यांना कधीही विसरू नका. या तीन व्यक्तींना केवळ तुमच्या उत्कर्षात आणि प्रगतीतच आनंद मिळतो. त्यामुळे आयुष्यात त्यांचा सन्मान आणि कृतज्ञता कायम ठेवावी.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देविदास गीते महाराज होते. व्यासपीठावर बिलोलीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. मैथिली ताई कुलकर्णी, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनुप अर्जुनराव अंकुशकर, नगरसेवक यशवंत गादगे, अमजद चाऊस, नगरसेविका गिरजाबाई मेडेकर, शाळेचे मुख्याध्यापक इरवंत खेमशेट्टे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांवरील आकर्षक व मनमोहक नृत्याविष्कारांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने सादरीकरण करत आपल्या कलागुणांची झलक दाखवली. या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या संस्थेतील पदाधिकारी शिक्षक यांचा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच ,नांदेड यांच्यावतीने, चळवळी योद्धे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर हे पुस्तक देऊन माजी नगराध्यक्ष आणि निवृत्त शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिलानंद गायकवाड यांनी केले. विशेष परिश्रम शाळेच्या शिक्षकांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

