नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणित करणारा ‘भारत पर्व 2026’ हा भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकारातून होणाऱ्या या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे.


26 जानेवारी रोजी हा महोत्सव सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत तर 27 ते 31 जानेवारी दरम्यान दररोज दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत खुला राहणार आहे. देशभरातील विविध राज्यांच्या पर्यटन, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे.

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य आणि आकर्षक दालन उभारण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटन वारशाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, अध्यात्मिक स्थळे, वन्यजीव पर्यटन व व्याघ्र प्रकल्प यांचे सादरीकरण येथे करण्यात आले आहे. तसेच राज्यातील विविध पर्यटन स्थळांवरील निवास सुविधा आणि खास पर्यटन पॅकेजेसची माहिती स्वतंत्र कक्षामार्फत दिली जाणार आहे.



‘गणेशोत्सव : आत्मनिर्भर भारताचे प्रतीक’ चित्ररथ
या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ – ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भर भारताचे प्रतीक’. हा चित्ररथ लाल किल्ला परिसरात विशेष ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक कलाकार, मूर्तिकार, कारागीर आणि लघुउद्योगांना रोजगार व आर्थिक बळ देणारा उत्सव कसा आहे, याचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडणार आहे.


खाद्यसंस्कृती, हस्तशिल्प व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
महोत्सवात पर्यटकांसाठी ‘पॅन इंडिया फूड कोर्ट’ उभारण्यात आले असून, देशातील विविध राज्यांच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच हस्तशिल्प व हातमाग बाजारात देशभरातील विणकर आणि कारागिरांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध असतील. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, सशस्त्र दलांचे बँड वादन, तसेच ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

