हिमायतनगर, अनिल मादसवार| अस्मानी संकटाने आधीच खचलेला शेतकरी वर्ग आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पूर्णतः आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामात झालेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे मोठे नुकसान सहन केल्यानंतर रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची शेवटची आशा टिकून आहे. मात्र ही आशाही वन्य प्राणी उद्ध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.


खरीपातील तुरीचे पीक जोमात आले असून शेंगा लागल्याने वन्य प्राणी शेतात घुसून सर्रास धुडगूस घालत आहेत. तर रब्बीतील हरभरा मोठ्या प्रमाणात निघाला असताना वानरांच्या टोळ्या व हरणांचे कळप दिवसा-ढवळ्या शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पीक हातातून गेले आहे.



शेतकरी दिवस-रात्र शेतात पहारा देत असूनही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याने मानसिक ताण वाढत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठोस मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता असून शासन व वन विभागाने शेतकरी हित लक्षात घेऊन तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अशी आर्त मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

