नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या उपवनसंरक्षक, वनविभाग – नांदेड यांनी नागरिकांना विशेष सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. टेंभीसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली आढळून येत असून, वनविभागाने शेतकरी आणि ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


वनविभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना समूहानेच जावे तसेच हातात काठी आणि मानेभोवती जाड कापड बांधावे. मोबाईलवर गाणी किंवा आवाज करणारी साधने वाजवत जावे, ज्यामुळे बिबट्या दूर राहण्याची शक्यता वाढते.

वनक्षेत्रात किंवा गावाजवळील उघड्यावर शौचास जाणे धोकादायक असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. शाळकरी मुलांनी समूहानेच शाळेत जाणे आवश्यक असून, पालकांनी मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


बिबट्यांबाबत चुकीच्या बातम्या, बनावट फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, अशी कडक सूचना वनविभागाकडून देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस घरांचे दरवाजे नीट बंद ठेवावेत तसेच घराबाहेर किंवा अंगणात झोपणे टाळावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्री एकटे बाहेर जाऊ देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पाळीव जनावरांना जाळीबंद बंदिस्त गोठ्यात ठेवणे आणि गोठ्यात प्रखर प्रकाश व्यवस्था करणे यावरही भर देण्यात आला आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास भटके कुत्रे वाढतात आणि त्यामुळे बिबट्यांचे आकर्षण वाढते, याचीही माहिती वनविभागाने दिली आहे.
वनविभागाने स्पष्ट केले की अचानक बिबट्या समोर आल्यास घाबरू नये, उभे राहून दोन्ही हात वर करून मोठा आवाज करत हळूहळू मागे सरकावे. बिबट्याला मार्ग द्यावा आणि त्याला डिवचण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. बिबट्या किंवा इतर हिंस्त्र प्राणी दिसल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा स्थानिक वनकर्मचारी व अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही हिमायतगरचे वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र मंगेश पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

