हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढता प्रभाव आणि नवतरुणांचा पक्षात वाढता ओघ पाहता, हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे (वडगावकर) यांनी दिली आहे.


येत्या काळात होणाऱ्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ जागा स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून, यासाठी “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठवाड्याचे लोकनेते तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करत असल्याने पक्षशक्तीला नवे बळ मिळत असल्याचेही वामनराव पाटील यांनी नमूद केले.

पक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि लोकसंपर्क या तीन आधारस्तंभांवर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. “हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी पर्यायी शक्ती बनणार आहे, आणि आम्ही सर्व जागांवर आत्मविश्वासाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत,” असा निर्धारही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


यावेळी शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, अभिलाष जयस्वाल, आकाश पाटील सूर्यवंशी, शीतल सेवनकर, आनंद गोसलवाड, साहेबराव बलपेलवाड, मंगेश धुमाळे पाटील, ओमकार चरलेवार, दत्ता माने चातारीकर, गणेश पाटील कदम विरसनी, संजूभाऊ गोसलवाड, पंढरीनाथ राहुलवाड, तसेच अनेक कार्यकर्ते व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


