उस्माननगर l जातीभेद, गरिबी-श्रीमंतीतील विषमता आणि स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आपली लेखणी झगडवणारे थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे हे शोषितांच्या वेदनेचे साक्षीदारच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रवर्तक होते. त्यांनी माणसाच्या सन्मानाला आणि समतेच्या तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून मानवी एकतेचा जागतिक संदेश दिला. आज देशाभिमानाच्या उदोउदोच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या या वैश्विक दृष्टिकोनाची, सर्वसमावेशक मानवतेच्या विचारांची, अधिकच आवश्यकता आहे.


असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेत अण्णा भाऊ साठे यांचा आंबेडकर विषयक दृष्टिकोन या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाऊंचे साहित्य हे केवळ विचारप्रवर्तक नव्हे, तर शोषणमुक्त समाजाची स्वप्ने पाहणारे आहे.



आंबेडकरी विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृती उमटले आहे. त्यांच्या लेखणीने उपेक्षितांना आवाज दिला, माणुसकीला केंद्रस्थानी आणले आणि समाजाला नवा दृष्टीकोन दिला, असेही डॉ. गोणारकर यांनी नमूद केले. रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे हे १७ वे वर्ष होते. सिडको ग्रामीणचे एपीआय मंगेश नाईक यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. गणपतरावजी वाडेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


यावेळी विचारपीठावर समाजसेविका शेख शकीला, उषाताई मोरे, जीवन पाटील घोगरे, ज्येष्ठ नेते पी. एस. गवळे, एम.एन. गवळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. के. कांबळे, माधव कांबळे, आर.जे. वाघमारे, प्रा. ब.ना. गोईनवाड, दत्ता पाटील खानसोळे आर्दीची उपस्थिती होती.

याप्रसंगी शेख शकीला, पी. एस. गवळे, स्वागताध्यक्ष विलास दादा गजभारे, डी. के. कांबळे, युवा नेते आनंदा सूर्यवंशी, मारोती चिवळीकर, दिलीप जोंधळे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुजाताताई पोहरे यांनी केले, तर अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक तथा संयोजक बा.रा. वाघमारे यांनी आभार मानले.
याप्रसंगी सम्राट आढाव, केशव कांबळे, अमृत नरंगलकर, आकाश सोनकांबळे, प्रदीप हनवते, विजय भंडारे, शिवाजी बुचडे, बबन बुचडे, कपिल वाघमारे, धनाजी वाघमारे, सोपान कांबळे, पिंटू पवळे, प्रल्हाद वने, शिवाजी वाघमारे, बालाजी कांबळे, प्रकाश गायकवाड, बी.सी. मोरे, संभाजी बसवंते, शंकर बसवंते, आनंदा गजले, व्यंकट भिसे, पांडुरंग भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

